Sunday, July 18, 2010

गोष्टीची गोष्ट

"आई, गोष्ट सांग ना!"



"एका गावात एक लाकुडतोड्या रहात असतो.."


"आSS ती नक्को, ती माहितेय मला"


"बर, मग भोपळ्यात बसणार्‍या म्हातारीची सांगते"


"नSक्कोSS"

"मग सांगू तरी कोणती?"

"रच्चून सांग"

"बर मग तुच सांग कोणती हवी?"

"फुलपाखराची सांगू?"

"चालेल" फुललेल्या चेहर्‍याने तिने होकार दिला आणि आमची गाडी पुढे सरकली.


"एका गावात फुलपाखर रहात असतात. अSSअ अ गावाचं नाव काय बर ठेवूयात? ते फुलातला मध खातात ना!मग मधुशाला ठेवुयात?"


"नक्को, त्यापेक्षा आपण आंबेगाव ठेवुयात. म्हणजे आंबे तरी खातील"


हसू दाबत मग गावाचं नामकरण होतं "आंबेगाव"


"तर त्या आंबेगावात फुलपाखरं रहात असतात."


"१००० आई १००० फुलपाखरं असतात"


"बर, त्या आंबेगावात हजार फुलपाखरं रहात असतात. त्यातल्या एकाच नाव असतं याया"


"हिहि! याया? चालेल"

"त्या यायाच्या आईचं नाव असतं.."


"आSSई, आSSई तिच नाव सिमा नाहितर सिमिन.. आणि"


"बर, तर आंबेगावात हजार फुलपाखर रहात असतात तिथेच या यायाच पण घर असतं. याया सकाळी उठून भराभर आवरुन शाळेत जात असतो.."


"आSSई, आSSई त्याची शाळा कशी असेल? त्याला ना शाळेत मध गोळा करायला शिकवत असतील. हो ना?"

"बरोब्बर, तर हा याया आणि त्याचा मित्र जाजा रोज सकाळी उठून शाळेत जात असतात मध कसा गोळा करायचा ते शिकायला"


"आSSई,आSSई "जाजा" नको"

"मग?"


"त्याच पण नाव यायाच ठेवूयात."


"अग, पण मग कळणार कसं कोण कोण आहे ते?"

"कळेल की, एक "याया कुलकर्णी असेल आणि एक याया जोशी" आमच्या वर्गातल्या इशान सारखा"

"खर्रच की, माझ्या हे लक्षातच नाही ह आलं"


"तर हे दोन्ही याया एकमेकांचा हात धरुन शाळेत जात असतात. एकदा काय होतं मधल्या सुट्टीत आईने दिलेला खाऊ खाऊन.."


"हॅ खाऊ नाही खात शाळेत. शाळेत पोळी भाजी खातात नाहीतर उपमा, पोहे खातात. जंक फुड इज नॉट अलाऊड इन स्कूल" "त्यांना देत नाहीत का टिफिन शाळेतूनच?"


"नाही ग त्यांची शाळा वेगळी आहे ना! विद्यानिकेतन मधे तुला देतात टिफिन पण विवेकानंद मधे कुठे द्यायचे?"


पटल पटल अशी मान डोलावली तिने आणि आमची गोष्ट परत एकदा याया कडे वळली.


मग गोष्टीत याया कुलकर्णी कसा वाट चुकतो, एका राक्षसाच्या घरात शिरतो. मग तो सिमिन आई सिमिन आई अस हाका मारत रहातो मदती साठी. घाबरुन राक्षसाच्या घरातल्या खिडकीला लावलेल्या ग्रील वर जाऊन बसतो.आणि तेव्हढ्यात तिथे एक छोटी राक्षसिण येते.


बाSSपरे! याया घाबरतो.

ती राक्षसिण त्याच्या जवळ जाते.


तो उडायचा प्रयत्न करतो पण घाबरल्यामुळे त्याला उडताच येत नसतं. तो फुलपाखरी भाषेत सांगत असतो "पकडू नको, मारु नको" पण ते राक्षसिणीला काही समजतच नसतं. तिला नुसतीच गुणगुण ऐकू येत असते. ती त्या फुलपाखराला पकडते. तो पंख सोडवून उडायचा प्रयत्न करतो तर त्याच्या पंखांचा थोडा रंग तिच्या बोटांना लागतो. ती त्याला स्वतःच्या तळहातावर ठेवते आणि मग खिडकी बाहेर हात काढून तशीच उभी रहाते. तेव्हा कुठे त्याला कळतं "ही चांगली राक्षस आहे. आपल्याला बाहेर पडायला मदत करतेय."


तो लगेच उडतो. परत जाण्यापुर्वी मागे वळून तिला थँक्स म्हणतो. तिला फक्त गुणगुण ऐकू येते पण तिला कळत त्या फुलपाखराला खूप आनंद झालाय. ती हे सांगायला घरात जाते. आणि आईच्या पदराला धरुन म्हणते "आई, परत कधी येईल ते फुलपाखरु आपल्याकडे?"


इकडे याया जोशी घाबरत याया कुलकर्णीच्या घरी पोहोचतो आणि काका काकुंना याया हरवल्याच सांगतो. सगळे काळजीत पडतात. सगळे इकडे तिकडे शोधायला लागतात. सिमिनला खूप काळजी वाटते. रडूही येतं. ती फुलपाखरेश्वराला हात जोडून नमस्कार करते आणि म्हणते "हे फुलपाखरेश्वरा माझ्या यायाचं रक्षण कर त्याला वाईट राक्षसांपासून वाचव."

सगळे शोधत शोधत पुर्ण शहर पालथ घालतात. शेवटी त्यांना एका घराबाहेरुन उडत आलेला याया दिसतो तेव्हा कुठे त्यांच्या जीवात जीव येतो. सिमिन तर त्याला कुशीत घेऊन रडते आणि पुन्हा असं कुठे हात सोडून जाऊ नकोस म्हणून रागावतेही.


याया सिमिनला त्या छोट्या आणि प्रेमळ राक्षसिणी विषयी सांगतो. तेव्हा त्याला आई कडून कळतं की ह्या राक्षसांच्या वस्तीत काही राक्षस फुलपाखरांच्या पकडून त्यांच्या पायाला दोरी बांधतात नाहीतर त्यांना काचेच्या बाटलीत बंद करुन ठेवतात. त्यांच्या चुलत भावा बहिणींना म्हणजे चतुर आणि टाचणीला पण हे राक्षस छळतात. पण काही राक्षस ह्या छोट्या राक्षसिणीसारखे प्रेमळही असतात.


"आई, मी कधीतरी त्या छोट्या राक्षसिणीच्या घरी जाऊ खेळायला?"


"जा पण मी किंवा बाबा बरोबर असताना"


"थँक यू आई"

याया अधून मधून सानिकाशी खेळायला जात असे. मस्त वेलीवर बसून झोके घ्यायला आणी तिच्या हातावर जाऊन ती काय चित्र काढतेय काय अभ्यास करतेय ते बघायला त्याला खूप आवडायचं

असेच बरेच दिवस जातात. त्या आंबेगावात कधी नव्हे त्या मारामार्‍या नी चोर्‍या व्हायला लागतात.


"आई, मारामार्‍या नकोत ग. मला नाही आवडत" इति लेक


"बर, आधी ऐक तर का होतेय मारामारी ते" गोष्ट सांगणारी मी


"ठिक आहे" म्हणत राजी झालेली ती


तर त्या आंबेगावात कधी नव्हे त्या मारामार्‍या नी चोर्‍या व्हायला लागतात.कारण काय? फुलपाखरे १००० आणि फुलं, झाडं किती? तर १०


मग त्यांच्यात मारामार्‍या कोणी कोणत्या फुलातला मध गोळा करायचा त्यावरुन. काही जण तर दुसर्‍याने गोळा करुन ठेवलेला मध हळूच चोरायचे ते कामावर गेले की. मग परत त्यावरुन मारामार्‍या. रोज कोणी ना कोणी पंख फाटला म्हणून फुलस्पितळात अ‍ॅडमीट. काही नाही तर जखमांवर उपचाराला ही भली मोठी रांग फुलखान्यात. एक दिवस ह्या सगळ्यावर उपाय काय ह्यावर चर्चा करण्यासाठी सिमिन आणि मोलू सगळ्या आंबेगावकरांना गावातल्या वेलीवर बोलावतात. त्यात सगळे आधी भांडतच बसतात. मग कोणीतरी म्हणत ह्यावर उपाय काय? असच भांडत बसलो तर आपण सगळेच अ‍ॅडमिट होऊ हातपाय मोडून.


मोठ्यांच्या मिटिंग बरोबर छोट्यांची पण एक मिटिंग भरते. त्यात याया सगळ्यांना सांगतो, "आई बाबांनी सांगितलय मला की फुलं, झाडं कमी आहेत म्हणून ही सगळी मारामारी होतेय्.दुसरी गाव शोधत बसण्यात सगळ्यांचीच शक्ती जाईल. मग असं केलं तर? आपण टिम पाडून


कामं वाटून घेऊयात. काही जणं दुसरी गावं शोधतील. काही आहे त्या फुलांवरुन मध गोळा करुन सगळ्यांना वाटतील तर काही जण चांगल्या राक्षसांना झाडं लावायला सांगतील."


"याया, अरे चांगली कल्पना आहे पण त्यांच्यातल्या चांगल्या राक्षसांना शोधणार कस?" यायाचा दुसरा मित्र जाजा त्याला विचारतो.


"अरे! एक छोटी प्रेमळ राक्षसिण माझी मैत्रिण आहे सानिका नावाची. ती करेल ना आपल्याला मदत"


"चालेल, मग आपण हे सगळं मोठ्यांना सांगुयात आणि आजच कामाला लागुयात"


आई बाबाच नाही तर संपुर्ण आंबेगावाला ह्या छोट्या फुलपाखरांचंकौतुक वाटतं. ते तसच करायचं ठरवतात.सानिकाला भेटायला याया आणि त्याच्या मित्र मैत्रिणींची टिम निघते.


इकडे सानिकापण आईला प्रश्न विचारुन हैराण करत असते. "आई, कधी परत येईल ग ते फुलपाखरु माझ्याशी खेळायला?" तितक्यात ग्रिलवर फुलपाखरच फुलपाखर येउन बसलेली तिला दिसतात. ती आनंदाने ओरडत त्यांच्याकडे पळते. त्या आवाजाने घाबरुन जाजा यायाचा हात घट्ट पकडून ठेवतो. पण याया त्याला हसत हसत धीर देतो.


याया उडत उडत सानिकाच्या हातावर जाऊन बसतो.आता त्या दोघांना एकमेकांची भाषा थोडी थोडी कळायला लागलेली असते. याया तिला त्यांच्या गावातल्या मारामार्‍या, झाडांच प्रमाण वगैरे सांगतो आणि तिला ती सगळ्या चांगल्या राक्षसांना झाडं लावायला सांगेल का ते विचारतो.


ती पण आनंदाने तयार होते आणि लगेच जाऊन आईला झाडं लावायचेत म्हणून सांगते.


फुलपाखरांना पण आनंद होतो. सानिकाने लावलेल्या इवल्या इवल्या झाडांवर बसून ते आपला आनंद व्यक्त करतात.


शाळेत गेल्यावर सानिका तिच्या सगळ्या मैत्रिणींना भक्तीला, रुचाला, श्रावणीला, केशवला, इशानला, आदित्यला ही फुलपाखरांची गोष्ट सांगते आणि त्यांनाही झाडं लावायला सांगते.


इथे आमची आजच्या दिवसाची गोष्ट संपते आणि दुसर्‍या दिवसासाठीची डिमांड आधीच नोंदवली जाते "आई, उद्या पिंकू परी हवी हा गोष्टीत..तिच्या कडे उडत जाणारं विमान हवं, झोपाळा हवा, चॉकलेटची झाड आणि आयस्क्रिमच कारंजं हवं..."

No comments:

Post a Comment