Sunday, July 18, 2010

गोष्टीची गोष्ट -२

पुन्हा एकदा मागणी झाली "आई, मरमेडची गोष्ट हवी त्यात याया पण हवाच हे ओघाने आलच"




"गोष्ट फार छोटी नको" हे पण शेपूट जोडीला होतं.



मग पुन्हा एकदा तिनेच मरमेडच नामकरण केलं "बार्बी" आणि आमची गोष्ट सुरु झाली.



एका निळ्या निळ्या समुद्राच्या तळाशी बार्बी नावाची मत्यकन्या रहात असते. तिच्या कपाळावर एक चमकता मणी असतो. ती तिथल्या राजा राणीची लाडकी मुलगी असते. खूप प्रेमळ असते ही बार्बी. त्यांच्या राजवाड्यात बरेच मासे, कासवं इतर जलचर प्राणी राजाची भेट घ्यायला येत असतात. राजा सिंहासनावर बसून त्या सगळ्यांना भेटत असे तेव्हा ही छोटी बार्बी त्याच्याच मांडीवर बसून राही. तिथेच तिला समजल की ह्या समुद्राच्या बाहेर देखील एक सुंदर जग आहे. तिथे तर्‍हेतर्‍हेचे प्राणी, राक्षस रहातात. तिथे चांदण्यात चमकणारी वाळू आहे, मोठ्ठी मोठ्ठी झाडं आहेत.



आणि झालं तिचा ६ वा वाढदिवस जेव्हा येतो जवळ तेव्हा ती हट्टच करते "मला समुद्राच्या बाहेर घेऊन चला



"बाळा, ते खूप लांब आहे आणि तिथे जायला बरेच दिवस लागतील. तू अजून छोटी आहेस शिवाय तिथे माणूस नावाचा प्राणी रहातो. माणूस प्राण्यात पण काही लोक दुष्ट आहेत. आणि आपण त्यांच्या तावडीत सापडलो तर ते आपल्याला मारुन टाकतील.आणि तुझ्या कपाळावरच्या मण्याच्या लोभाने ते तुला पकडून ठेवतील"



"नाही, मला तिथेच जायचय. आपण लवकर परत येऊ. मी हात सोडणार नाही तुम्हा दोघांचा. प्रॉमिस! समुद्रेश्वराची शपथ" अस त्यांना सांगून ती त्यांना तयार करते.



शेवटी लेकीच्या हट्टापुढे राजाराणी हात टेकतात आणि जास्त न रेंगाळता एका दिवसात परतायचं ह्या बोलीवर तिथे जायची तयारी करायला सुरुवात करतात.



बार्बीला खूप आनंद होतो. तिच्या मैत्रिणींना ती सांगते "मी तिथून तुमच्यासाठी चमकणारी वाळू घेऊन येईन. जमल तर झाडाचं पान आणेन आणि काय काय गमती करेन ते पण सांगेन" त्यादिवशी ती झोपेत पण त्याच विचाराने हसत असते हळूच.



दुसर्‍या दिवशी बरोबर कोरल्सच सँडवीच घेऊन राजाराणी आणि बार्बी निघतात प्रवासाला. प्रवास थोडा दमणूक करणारा असतो पण डॉल्फिन त्या तिघांना आपल्या पाठीवर बसवून किनार्‍याला आणून सोडतात.



किनार्‍याला पोहोचतात तेव्हा रात्र झालेली असते. किनार्‍यावर तशी सामसुमच असते. बार्बी चंद्रप्रकाशात चमकणारी वाळू बघून खुपच खुष होते.



पण त्या किनार्‍यावरच झोपडी बांधून एक माणूस रहात असतो. तो ह्या तिघांना बघतो. बार्बीच्या कपाळावरचा चमकणारा मोती बघून त्याला हाव सुटते. ह्या मत्सकन्येला पकडून मारले तर तो मणी विकून आपण खूप श्रिमंत होऊ असा विचार करुन तो एक योजना आखतो. त्याच्याकडे मासे पकडायच जाळं असतं. वाळूत खेळून दमून थकून तिथे बसलेल्या राजा राणी आणि बार्बीवर तो हळूच ते जाळं टाकतो आणि फासे आवळतो. त्यांना कळायच्याही आधी ते त्याच्या जाळ्यात अडकतात. धडपड करुन देखील जेव्हा सुटका होत नाही तेव्हा ते मदतीला हाका मारतात.



तिथूनच जवळ अबडक फुलपाखरु उडत जात असते. ते ह्या तिघांच्या मदतीच्या हाका ऐकतं पण ते असतं छोट आणि दुबळं मग ते यायाला बोलावतं. याया पण विचार करतो आणि काळू कावळयाला मदत करायला सांगतो.

काळू कावळा फार प्रेमळ आणि हुषारही असतो. तो थोडा विचार करतो आणि यायाला म्हणतो "आपण एकएकटे काही मदत करु शकणार नाही. तेव्हा असं करुयात.."

"मी त्या माणसाचं लक्ष माझ्याकडे वेधून घेतो त्याच्या जवळून उडत जाऊन. आपण उंदिर मामाचीही मदत घेऊयात. त्या मिंटू उंदराला सिंहाला जाळ्यातून सोडवण्याचा अनुभव आहेच. मी त्या माणसाला माझ्या मागे यायला लावून दूर नेईन. तोपर्यंत मिंटू त्यांना जाळ्यातून सोडवेल. तुम्ही दोघं माश्यांना निरोप द्या की आणि डॉल्फिन माशांना किनार्‍याजवळ बोलवून ठेवा. म्हणजे मिंटूने जाळं तोडल्या तोडल्या ते तिघेही डॉल्फिन्स वर बसून त्यांच्या घरी वेगाने जातील. अगदीच त्रास द्यायला लागला तो माणूस तर मी आणि चिमणी ताई मिळून त्याला चोच मारुन हैराण करु."



काळू कावळ्याची ही योजना ऐकून यायाला खूप आनंद होतो. आणि ठरल्याप्रमाणे सगळ घडून येऊन बार्बी आणि तिचे आई बाबा राजवाड्यात सुखरुन परत जातात.



थोड्याच दिवसात राजा खूप सारे मोती भेट म्हणुन याया, काळू, चिऊताई, मिंटू आणि डॉल्फिनला राजपत्रासोबत पाठवून धन्यवाद देतो आणि आपली मैत्री अशीच राहुदे अशी प्रार्थना करतो.

No comments:

Post a Comment