Thursday, November 18, 2010

वटवृक्ष आणि गवत

बर्‍याऽऽच वर्षापूर्वीचं हे गाव. आटपाट नगरी होतं त्याचं नाव.

आटपाट नगरातून वाहायची एक नदी. नदीकाठी पसरली होती जणू गवताची गादी!

सकाळी गुरं सोडावीत चरायला त्या गवतात आणि यथेच्छ डुंबावं नदीत आणि संध्याकाळ घालवावी गवतावर लोळण्यात हा तर रोजचाच परिपाठ गावातल्या काही मुलांचा. पण दुपार होताच वर सूर्यबाप्पा आऽऽग ओकू लागे, मग मात्र गवतातून चालणंदेखील मुश्किल होऊन बसे.


मुलांचे असे पाय भाजू लागले की त्या गवताला मात्र फार फार वाईट वाटे. अशावेळी त्याला वाटे 'का मला देवबाप्पाने असा छोटा ठेवला? मी पण वाढलो असतो जर ह्या वडाच्या झाडासारखा... तर धरली असती ना मीही सावली ह्या मुलांवर, मग पक्ष्यांनाही वाटलं असतं ऊन-पावसात माझ्या पात्यांवर घरटं करावं नि व्हावं सुरक्षित. पण मी हा असा छोटासा! आणि माझा हिरवा रंगपण टिकत नाही वर्षभर. माझा काहीच उपयोग नाही कोणाला!'


असं त्याने म्हटलं की वार्‍याची एक झुळूक येऊन समजूत काढी त्याची. गुदगुल्या करुन त्याला थोडं हसवी. त्याचे हे बोल ऐकून तिथून उडणारं फुलपाखरुही थांबे त्याच्याजवळ आणि म्हणे "असं का वाईट वाटून घेतोस तू मित्रा! तू आवडतोस की आम्हाला. तुझ्या पात्यांवर बसून खेळायला आम्हांला येते की खूप मजा, जी मजा आम्हाला पारंब्यांवर नाही येत. तो देतो सावली पण तूही देतोस की आनंद, मग कशाला वाटून घेतोस वाईट?"

वार्‍याचं आणि फुलपाखराचं असं बोलणं गवताला बराच धीर देऊन जाई. मग ते प्रेमळपणे बघत बसे समोरच्या वडाच्या झाडाखाली बसलेल्या मुलांकडे.


उन्हाने पाय भाजायला लागताच वड ह्या मुलांना आपल्यापाशी बोलवी. त्याच्या सावलीत बसून मग ते बरोबर आणलेल्या डब्यांचा चट्टामट्टा करीत आणि उन्हं कलण्याची वाट बघत झाडाखालीच आराम करीत. नाहीतर मग पारंब्यांचा झुला करुन दुपार सरेऽऽपर्यंत तिथेच वेळ काढीत.

त्याकाळी घरात काही आजच्यासारखे नळ नव्हते. मग कपडे धुवायला, अंघोळींना सगळी माणसं नदीवरच येत. सकाळची वेळ असेल आणि ऊनही नसेल तेव्हा आईबरोबर नदीवर आलेली मुलं आईचं काम संपेपर्यंत ह्या गवताबरोबरच खेळत बसत. तेव्हा मात्र ह्या गवताला कोऽण आनंद होत असे. पण खरा चेहरा तेव्हा फुले, जेव्हा एखादा वाटसरू दमून भागून त्या वडाच्या झाडाखाली बसे आणि बैलगाडीच्या बैलांना हे गवत खाऊ घाली तेव्हा. आपण त्या बैलांची भूक भागवू शकलो ह्या आनंदात त्याला स्वतःच्या छोटेपणाचं दु:ख विसरायला होई.

दिवस असेच जात होते. पण कसे कोण जाणे माणसाच्या दुनियेतले काही वाईट गुण त्या वटवृक्षालाही येऊन चिकटले.


'मी सावली देतो म्हणून ह्या मुलांना, दमल्या भागल्या वाटसरूला माझा आधार वाटतो. पक्ष्यांनाही घरटं करायला मी जागा देतो!' असे विचार त्याच्या मनात वाढायला लागले आणि मग दिवसेंदिवस त्याला गवताचा छोटेपणा खुपायला लागला. 'मीच सर्वश्रेष्ठ!' असं म्हणून तो गवताला कमी लेखू लागला आणि हळूहळू त्याचा पूर्वीचा प्रेमळपणा कमी होऊन त्याची जागा गर्वाने घेतली.

अशा गर्विष्ठ झालेल्या वडाला मग गवताशी कोणीही मैत्री केलेली चालेनाशी झाली. मुलांनी गवतावर लोळण घेणं त्याला सहन होईना. त्याच्या फांदीएवढीदेखील उंची नसलेल्या गवताची फुलपाखरांनी विचारपूस करावी हे ही त्याला बघवेना. गवताबरोबर खेळून त्याच्यापाशी आलेल्या फुलपाखरांना तो हाकलून लावी.

मुलं दूर गेली की मग तो गवताला हिणवत म्हणे "ए गवता, तुझं राज्य अजून काहीच दिवस. तुझा हा सारा हिरवा डोलारा फक्त हा पावसाळा संपेपर्यंतच. नंतर जेव्हा उन्हाचे तडाखे बसतील तेव्हा तू जाशील करपून"

हे ऐकून गवत बिचारं रडवेलं झालं की त्याला आनंद होत असे. अधिकच जोमाने मग ते गवताला वाईट वाटेल असं बोलत असे. गवत बिचारं उदास होऊन त्याला म्हणे "झाडभाऊ, असं का हो म्हणता? मी तुमच्याएवढा मोठा नाही हे मान्य आहे मला. पण आपल्या दोघांनाही ज्या देवाने बनवलंय त्याने प्रत्येकाला काहीतरी काम देऊन पाठवलंय ना, मग असं असताना का बरं असं टोचून बोलता मला माझ्या छोटेपणावरून, माझ्या थोडेच दिवस टिकणार्‍या हिरव्या रंगावरून?"

पण गर्वाने फुललेल्या वडाला काही हे शहाणपणाचे बोल पटायचे नाहीत. स्वतःलाच श्रेष्ठ समजत तो गवताला कमी लेखायची संधी काही सोडायचा नाही.

त्या वटवृक्षाचं हे वागणं कोणालाच आवडत नव्हतं. त्याच्या फांद्यांवर घरटं केलेल्या पक्ष्यांनीदेखील समजावून पाहिलं त्याला. पण छे! उलट त्याने घरटं असलेल्या फांद्या हलवून, त्यांनाच हैराण केलं.

"माझ्या फांद्यांवर राहायचं असेल तर त्या गवताची बाजू घ्यायची नाही. मलाच मोठा म्हणायचं" असा दमच दिला त्याने सगळ्या पक्ष्यांना.

शेवटी त्याच्या अशा वागण्याला कंटाळून, पक्षी दुसर्‍या झाडावर घरटं करायला निघून गेले. तरीदेखील त्याचं वागणं काही सुधारलं नाही.

"इतकी घमेंड बरी नव्हे. तुझ्यापेक्षाही मोठी झाडं बनवलीत देवाने. पण ती नाही असा गर्व करीत." वार्‍यानेही समज देत सांगितलं.


पण माणसाच्या दुनियेतला 'मी'पणा, गर्व एकदा शिरला अंगात की तो असा सहजासहजी निघत नाही हेच खरं. त्या वृक्षाचं वागणे काही सुधारत नव्हतं.

शेवटी वार्‍यानेच त्याला अद्दल घडवायचं ठरवलं आणि एक दिवस वादळ होऊन वारं थडकलं.

वादळाच्या वार्तेने सगळे गावकरी आपापल्या घरात बसून राहिले. पक्षीदेखील सुरक्षित ठिकाणी जाऊन बसले. घोंघावत आलेल्या ह्या आपल्या मित्राला गवताने बरोबर ओळखले. त्याला प्रेमाने थोपवायचा प्रयत्नदेखील केला त्याने. पण त्या वडाच्या झाडाला धडा शिकवायचा निश्चयच करुन आलेलं ते वादळ! घोंघावत त्याने वटवृक्षाला घेराव घातला. वटवृ़क्षाने सगळ्या पारंब्या पसरुन वादळाला थोपवायचा प्रयत्न केला, पण त्या अक्राळविक्राळ रूपापुढे त्याचा टिकाव काही लागला नाही. वटवृक्षाच्या बर्‍याच फांद्या तुटून खाली पडल्या.

गवत अजूनही वार्‍याचा राग शांत करायचा प्रयत्न करतच होतं. वार्‍यालाही काही पाडायचं नव्हतं त्या वृक्षाला. त्याला फक्त घडवायची होती अद्दल, म्हणून जेव्हा वृक्षाने केली क्षमायाचना वार्‍याकडे आणि गवताकडे, तेव्हा वादळ झालं शांत.

जेव्हा वृ़क्षाने केला पुढे हात मैत्रीसाठी, तेव्हा गवतानेही मनात काही राग न धरता धरला त्याचा हात. पुन्हा सारं झालं पहिल्यासारखं. झाड पुन्हा गजबजलं पक्ष्यांच्या किलबिलाटाने.

एक दिवस वृक्षाने विचारलं गवताला, पक्ष्यांना आणि वार्‍याला, "इतका मी वाईट वागलो तुम्हा सगळ्यांशी, तरी तुम्ही मला माफ केलंत. माझ्याशी पुन्हा मैत्री केलीत. राग नाही येत का माझा तुम्हाला कधी?"

तेव्हा एकमुखाने सगळे म्हणाले, "मनात राग ठेवून वागायला आपण काय माणसं आहोत का?"

Sunday, September 26, 2010

कहाणी निसर्गाची

(आत्तापर्यंत ज्या छोट्या दोस्तांनी एकतरी ट्रेक केलाय त्यांना ह्यातले गुंफा, पाण्याची टाकं हे शब्द ठावूक असतील. ज्यांना माहित नाहीत त्यांनी एकदा हया गोष्टी खालचे फोटे बघितले तरी त्यांना ते पटकन कळतील.)

कोणत्या तरी आडगावात सुरु होतो हा सारा प्रवास, अगदी पायथ्यापासून. आणि वळणं घेत घेत वर, डोंगर माथ्यापर्यंतं जाऊन थबकतो. पावसाळ्यात पावसाशी सलगी करत वाटही हिरवी होते तर बोचर्‍या थंडीत ती वार्‍याचीच शाल पांघरते.

म्हणूनच ह्या नागमोडी वाटेच्या सोबतीला असतो घोंगावणारा वारा आणि असते सोबतीला कधी गर्द हिरवाई तर कधी उन्हाची फुले. नागमोडी वाट एखाद्या वळणावर विश्रांती घेत थांबते, तेव्हा फुलपाखरांशी हितगुज करणार्‍या फांदीशी घटकाभर ती ही मन मोकळं करते.

एखादं पाखरु, एखादं लेकुरवाळं माकड पोटाला चिकटलेल्या पिल्लासोबत करतं कधी तिची सोबत ह्या दमायला लावणार्‍या चढावावर. तर कधी आधीच वर जाऊन पहातं तिच्या तिथे पोहोचण्याची वाट.

अशी ती "वाट" आपल्याच चालीत चालत वर गुंफांपाशी विश्रांती घेते तेव्हा गुंफेच्या बाजुची पाण्याची टाकं भागवतात तिची तहान आणि गुंफेतली शांतता करते तिलाही शांत.

हे असं चालूच असतं दिवसेंदिवस, महिनोंमहिने, वर्षानूवर्ष अन् युगानू-युगे. तसा गावातला "माणुस" प्राणीही करतो तिला सोबत. तिच्यासारखाच तो देखील एक भाग वाटतो तिला ह्या निसर्गप्रवासाचा.

पण गेली काही वर्ष ह्या माणसाच्या कोणत्या तरी शहरी रुपाने तिच्या सोबत यायला सुरुवात केल्यापासून तिला नव्याने दर्शन घडलं ह्या प्राण्याचं. आधीचा तिला माहित असलेला, तिला सोबत करणारा माणूस आणि हा आताचा नविन माणूस दोघेही एकच प्राणी आहेत ह्याची खात्रीच पटत नव्हती तिची बरेच दिवस.

"बरेच दिवस झाले, अजून किती दिवस ह्या माणसाचं मनमानी वागणं सहन करायचं आपण? वारा घोंगावत म्हणाला तशी त्याला दुजोरा देत वाट म्हणाली "हो ना! हा माणूस इथे यायला लागल्या पासून माझी तर बाई फार वाट लागलेय. खाल्ल चॉकलेट, टाकलं रॅपर. खाल्ला चिवडा, टाकली पिशवी. प्याण्याची बाटली रिकामी झाली, दिली फेकुन इथेच. झाडांची पानं पडली खाली तरी जातात ती मिसळून ह्या मातीत. पण ह्या माणसाने टाकलेल्या प्लॅस्टीकच्या वस्तू माणसासारख्याच वातावरणापासून कायम फटकून. किती दंगा करतात ही लोकं आणि घाण तरी किती करतात. इथे येईपर्यंत श्वास गुदमरतो माझा. अगदी कंटाळा आणला बॉ माणसाने ह्या आता. ह्याला खरच कोणीतरी धडा शिकवायलाच हवा एकदा."

गुंफेनेही उसासे टाकत आपलं गार्‍हाणं मांडत म्हंटलं "नाहीतर काय, दमून भागून येतात, पाय दुखत असतील म्हणून घटका दोन घटका ह्यांना आश्रय देते. तर बसावं ना शांतं, ते नाही. येतात आणि वर पराक्रम केल्याच्या थाटात स्वतःचं नाव माझ्या अंगा खांद्यावर कोरतात."

इतका वेळ शांत बसून सगळं ऐकत असलेली पाण्याची टाकं पण संभाषणात भाग घेत म्हणाली "पावसाचं पाणी साठवून सगळ्या पांथस्तांची तहान भागवणं हे आमचं काम. पण ही माणसं यायला लागल्या पासून माझं पाणी देखील गढूळलं"

"इतकी वर्ष इथले गावकरी आपली सोबत करत आहेत पण त्यांनीहि कधी आपल्याला त्रास नाही दिलेला. पण आता येतात ती माणसं ह्या गावकर्‍याच्याच जमातीतली आहेत हे सांगूनही खरं वाटत नाही इतकी ह्यांची वागण्याची तर्‍हा निराळी आहे." झाडा झुडपांनीही आपल्या मनातल्या व्यथेला पानं सळसळवून वाट देत म्हंटलं.

"पुर्वी किती शांतता होती इथे, स्वच्छता होती इथे" झाडं झुडपं एका सुरात म्हणाली.

"खरच पुर्वी सारखा आपला प्रवास कधी होणार पुन्हा एकदा शांत सुखद? पुर्वी कधी तरी दिसायचे का वळणावळणावर प्लॅस्टीकच्या बाटल्या आणि रॅपर? दिसायचा का बाण काढून दिशा कळायला केलेला दगडांचा वापर?

पाऊस म्हणाला "वाटभर चिखल करुन पाहिला"

वारा म्हणाला "घूं घूं करत घाबरवणारा आवाज देखील करुन पाहिला"

तसं माकड खिन्न होत म्हणालं "पण आपण कसे रोखणार त्यांना? त्यांच्याकडे मजबूत दोर आहे. कडेकपारीत अडकून राहतील अशी साधनं आहेत. त्या जोरावर ते इथे येतच रहाणार. पावसालाने कितीही चिखल केला, वार्‍याने वादळी रुप घेऊन घाबरवलं तरिही ती येतच रहाणार, पुन्हा पुन्हा. त्यांच्या स्वतःच्या राज्यात त्यांनी नैसर्गिक जंगलं तोडून तिथे त्यांच्या रहाण्यासाठी सिमेंटची जंगलं उभी केल्येत. ते असेच अतिक्रमण करत रहाणार जिकडे तिकडे"

"ह्यावर काहीच उपाय नाही का?" गुंफेने उदास होत विचारले.

बर्‍याच विचारांती माकडाला एक मार्ग सुचला. माकड म्हणे "आहे, ह्यावर एकच उपाय आहे. त्यांना कडाडून विरोध करायचा. माणसाला माणसाचीच भाषा कळते. माणसांच्या राज्यात मागण्या पुर्ण करण्यासाठी माणूस जातो संपावर. आपणही तेच करायचे?"

"म्हणजे नक्की करायचे काय?" गुंफेने विचारले.

"आपण अजिबात करायचं नाही सहकार्य माणसाला. वार्‍याने त्यांना हवं तेव्हा वहायचच नाही, सुर्याने आग ओकायची ते आले की. दगडाने दाखवायची नाही दिशा आणि वाटेने करायची नाही सोबत. गुंफेने नाकारायचा आसरा आणि पाण्याच्या टाकांनी जायचं सुकुन" माकडाने समजावत सांगितलं.

"पण त्यामुळे पक्षांनाही मिळणार नाही पाणी" टाकं अस्वस्थ होत म्हणाली.

"चालेल, आम्ही शोधू दुसरा मार्ग पण आता माघार घ्यायची नाही" पक्षांनीही आपला सहभाग नोंदवत म्हंटलं.

"आणि सगळेच संपले उपाय, नाहीच आला माणूस वठणीवर तर...? तर कायमचच जायचं आपण संपावर, मग नाही उरलो तरी चालेल पण आता झुकायचं नाही" गुंफा त्वेषाने म्हणाली तसे सगळे एकसुरात म्हणाले "हो.. हो आपण जायचच आता संपावर. आजपासून.... आत्तापासून."

"आलाच कोणी माणूस तर मी त्याच्या सोबर चालणंच नाकारेन" म्हणते वाट.

"वारा म्हणे "मी वहायचंच थांबेन तो आला की"

गुंफा म्हणे "मी अजिबात देणार नाही आसरा त्याला. हवं तर मी मोडून घेईन स्वतःला"

पाण्याचं टाकं म्हणे "आम्ही जाऊ सुकून"

दगड म्हणे "मी झिजवेन स्वतःला आणि पुसून टाकेन सगळ्या खूणा"

माकड म्हणे "मी ही एक काम करेन. जेव्हा जेव्हा माणूस वाटेवर कचरा करेल तेव्हा तेव्हा मी त्याची वाट अडवून उभा राहीन."

एकजुटीने आपण सगळे ह्या माणसाला धडा शिकवू म्हणाले सगळे आणि लागले कामाला.

खालून ट्रेकला सुरुवात करणार्‍या माणसांच्या गटाला माहितच नव्हता हा "निसर्गाचा संपाचा निश्चय". त्याने केली नेहमी प्रमाणे खुणा शोधत चढायला सुरुवात. बराच काळ गेला तरी खूणा काही सापडत नव्हत्या त्याला. वर उन देखील मी मी म्हणत अंगाची काहिली करत होतं. वार्‍याची साधी झुळूक देखील नव्हती सोबतीला. जवळचं पाणी संपत आलेलं. असं पुर्वी कधीच नव्हतं झालं. वारा नव्हता, वाट सापडत नव्हती आणि वर उन्हाने तापत चाललेल्या डोक्याला काही सुचत नव्हतं.

गृपच्या लिडरने काही काळ विश्रांती घेऊन, खाऊन मग पुन्हा मार्ग शोधायचं ठरवलं. डबे उघडले, जेवण झालं. रिकाम्या पिशव्या आणि प्लॅस्टिकचे डब्यांचं ओझं कमी करुन पुढे जायचं ठरलं. डबे झाडीत फेकताच माकडांनी हल्ला बोल केला आणि अर्ध्यावर ट्रेक सोडून माणसांना पळ काढावा लागला.

असं पुर्वी कधीच झालं नव्हतं. प्रत्येक ट्रेक यशस्वी करुन, वरती डोंगर माथ्यावर झेंडा फडकवून परतायचं हाच नेहमीचा शिरस्ता त्यांचा. पण आजचा दिवस वेगळाच होता. जे पुर्वी कधी झालं नव्हतं ते आज झालं होतं. असं का झालं? विचार करुन त्यांचं डोकं दुखायला लागलं होतं.

आणि वरती पुन्हा एकदा दरी खोर्‍या, झाडी पक्षी, डोंगर वाटा आणि गुंफांचं आनंद गीत सुरु झालं होत्म, पुन्हा एकदा निसर्गाचं गाणं सुरु झालं होतं.



 (गोरखगडच्या केव्ह्ज/ गुंफा)










नाणेघाटातली ही गुंफा आतून बघा किती मोठी आहे. ४० एक माणसं तरी सहज झोपू शकतील इथे



 पेठ किल्ला/ कोथलीगडाच्या इथली ही केव्ह्ज बघा. ट्रेकर्स जागा घाण करतात म्हणून गावकर्‍यांना शेवटी असा संदेश लिहावा लागलाय तिथे






(नाणेघाटातल्या केव्ह्ज/गुंफा) त्या गुंफांच्याच बाजुला जे खड्यासारखे चौकोन दिसतायत ती आहेत पाण्याची टाकं. ह्या खड्यासारख्या चौकोनांमधे पावसाचं पाणी साठून रहातं





 (नाणेघाटात असलेल्या टाकांचा हा अजून एक फोटो)









 ही आहेत रतनगडवरची टाकं


Friday, July 30, 2010

कहाणी चवळीचटकच्या लोकांची

(लेक कुरुकुर करायला लागली की मी तिला ह्या दोन मित्रांची नावं सांगायचे "एक सदा हसे आणि दुसरा रडत राऊत" रडत राऊन नेहमी रडतो आणि रडवतो तर सदा हसे हसतो हसवतो. तिला ह्या नावांची गंमत वाटायची म्हणून "रच्चून सांग ना त्यांची गोष्ट मधे त्या दोघांची नाव समाविष्ट झाली :P)


 
अटकमटकराज्यातल्या चवळी चटक गावात एके दिवशी एक जम्मतच होते. गावातले सगळे लोकं धाय मोकलून रडायला लागतात. दात घासताना रडतात, न्याहारी करताना रडतात. दिवसभर आपले रडतच बसतात. हे रडणं थांबायला ते गावातल्या दवाखान्यात जातात. तर तिकडे काय बघतात? तिकडेही डॉक्टर रडतच औषध देत असतात. गावकरी घाबरुन जातात. डॉक्टर म्हणतो हा काहितरी व्हायरसचा प्रताप असणार.. माझ्याकडे तरी ह्यावर औषध नाही. दुसर्‍या गावातल्या दवाखान्यात जाऊन बघायला हवं. गावात तर सगळ्यांनाच ह्याची लागण झालेय.




गावकरी मग हे रडणं थांबण्यासाठी सर्कशीतल्या विदुषकाला बोलावतात. तो ही बिचारा आजारी असतो. येतो तोच मुळी रडून रडून नाक लालबुंद करुन. रडतच तो विचारतो "काय सेवा करु? उड्या मारुन दाखवू? की नकला करुन दाखवू?" इतक बोलूनही पुन्हा रडायला लागतो ढसाढसा.



"अरे! तुच काय रडतोयस? आमचं रडणं बंद व्हावं म्हणून ना तुला बोलावलं इथे? तुला पण झालेय बाधा रडण्याच्या व्हायरसची?" सरपंच त्याला विचारतात.



"बघा ना सरपंचजी, काल सर्कशीत एक माणूस आला त्याच्याकडून मी हा सदरा घेतला आणि झालं तेव्हापासून माझं रडणं काही केल्या थांबतच नाहीये" डोळे पुसत पुसत विदुषक त्यांना सांगतो



"अच्छा! तो नवीन दुकानदार "रडत राऊत" त्याच्याकडूनच घेतलास का विदुषका तू सदरा?"



"होय होय तोच तोच"



"अरेच्चा! आम्हीही त्याच्याकडूनच घेतलाय सदरा. म्हणजे हा सदरा आहे की काय कारण ह्या व्हायरसचे?"



"चला गावाची बैठक बोलवा"



"होSS होSS आत्ताच दवंडी पिटूयात. चला लागुयात कामाला"



"ऐकाSS होSS ऐकाSS. चवळीचटकच्या रहिवाशांनोSS ..



ढम्मSSढम्म ढम्म ढम्म ढम्मSS..



कान देऊन ऐकाSS...



उद्या दुपारी जेवण झाल्याबरोबर सगळ्या गावकर्‍यांनी चावडीपाशी जमावे होSSSS येताना "रडत राऊत ह्या व्यापार्‍याकडून घेतलेला सदरा घेऊन यावे होSSS "



"गावाला झालेल्या ह्या नव्या विषाणूवर उपाय करण्यासाठी सगळ्यांनी हजर रहावे होSSSS"



गावात दवंडी फिरते तशी सगळे रडत रडत एकमेकांकडे चौकशी करायाल लागतात.



"काय होणार आहे रे उद्या दुपारी चावडीवर?" रडवेला चेहर्‍याचा रामू शामुला विचारतो.



"मलाही नाही माहित. पण खूप कंटाळा आला बघ आता रडून रडून" डोळे नाक पुसत पुसत शामु रामुला उत्तर देतो.



तो दिवस रडारडीतच पार पडतो. दुसरा दिवस उजाडतो, सकाळ सरते.दुपार होते. तशी सगळे गावकरी रडत रडत चावडीवर जमा होतात.



सगळ्यांचे डोळे रडून रडून सुजलेले असतात. नाक लाल झालेले असते. चेहरा रडुन रडून सुकलेला असतो आणि तरिही रडं थांबलेलं नसतं.



सरपंचजी येतात, येताना बरोबर कुणा व्यक्तीला घेऊन येतात. येतात तेच चक्क हसत हसत. डोळ्यात एक टिप्पूस पाणी न आणता, डोळे - नाक लाल न होता.



सगळे रडत रडत त्यांना विचारतात "सरपंचजी सरपंचजी असं कस्सं झालं?" "आम्ही रडतोय आणि तुम्ही हसताय? तुम्हाला बरं औषध सापडलं. काय केलत तरी काय?"



"होSS होSS सांगतो सांगतो. आधी सांगा मी सांगितलेला सदरा घेऊन आलायत का?"



सगळे एकाच रडक्या सुरात होSS म्हणतात. जे सदरा घालून आलेले असतात त्यांची तर अवस्था फारच वाईट असते. गडबडा लोळण घेत ते धाय मोकलून रडत असतात.



"तर आता एक काम करा. इकडे होळी पेटवा बघू आधी. आणि त्या होळीत तुम्ही घेतलेले हे सदरे जाळून टाका"



"काय? जाळून टाकायचे? का पण? आणि आमचे पैसे?"



"तुम्हाला रडत रहायचय की बर वाटायला हवय?"



"नाही नाही रडायच नाहीये आम्हाला" डोळ्यातून येणार पाणी पुसत पुसत कुशाबा कसे बसे बोलतात.



"मग माझं ऐका आणि सगळे सदरे जाळून टाका."



"आणि.... मग?"



"आणि हा जो व्यापारी आलाय माझ्या बरोबर त्याच्याकडून घेतलेले सदरे वापरायला सुरुवात करा"



"ह्या! असं कधी असतं होय?"



"तसच आहे हे. तुमचा विश्वास नाही बसत आहे का? बर मग राम्या तू ये बघू इकडे तुझा सदरा घेऊन. उपाय नाही झाला तर मी तुला त्याचे पैसे परत करतो मग तर झालं?"



"हम्म! आता राम्या हा तुझा सदरा मी ह्या होळीत जाळून टाकतो. "



भस्सSS काय लाल निळ्या ज्वाळा निघाल्या त्यातून.



"आता ह्या "सदा हसे" कडून तू एक सदरा घे बघू."



"हम्म! आता हा नवा सदरा अंगात घाल"



"हाSSहाSSहाSSहाS सरपंचजी मला हसता यायला लागलं, रडणं पळून गेलं माझं"



"हे काय तरी आक्रितच दिसतय. पण बरोबर बोलतायत सरपंच" सगळे एकमेकांत बोलतात. एक एक जण पुढे येतो नी "रडत राऊत" कडून घेतलेल्या सदर्‍याची होळी करतो. आणि सदा हसे कडून नवीन सदरा विकत घेऊन तो अंगात घालतो.



"पण असं झालं कस?" सगळ्यांना प्रश्न पडतो.



सदा हसे बोलायला उभा रहातो.



"माझ्या दोस्तांनोSS, मी आणि रडत राऊत दोघेही एकदा व्यापारा निमित्त एका गावात एकत्र आलो. दोघांचाही तयार कपड्यांचा व्यवसाय होता म्हणून ओळखही झाली एकमेकांशी. आमची आधी मैत्री झाली आणि आम्ही दोघे मिळुन व्यापार करायला सुरुवात केली. रडत राऊत मुलखाचा रड्या होता. जर्रा काही झालं की रडायचा. सुरुवातीला जेव्हा आम्ही एकत्र व्यापार करायचो तेव्हा माझ हसणं आणि त्याचं रडणं अस बेमालूम मिसळायचं सदर्‍यात की लोकं ना जास्त हसत बसायची ना कायम रडत रहायची. पण नंतर त्याचं रडणं वाढत गेलं आणि मला दुसर्‍या "आनंद महागुरुची" साथ मिळाली तसा त्याने माझ्या बरोबरचा व्यवसाय बंद करुन स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. त्याच्या कडून कपडे घेऊन घालणारेही त्याच्याच सारख रडायला लागायचे. लोकांना जेव्हा हे कळल तेव्हा त्यांनी त्याला गावातून पळवून लावलं.

मग त्याने काय केलं? तो तुमच्या गावात आला. त्याने कमी किमतीला सदरे विकायला सुरुवात केली आणि सगळे सदरे विकून तो इथून पुढच्या गावी गेला. जाताना त्याचा रडवेपणा सदर्‍यांबरोबर इथे सोडून गेला. तुमच्या सरपंचांच्या हे लक्षात आलं विदुषकाच्या बोलण्यावरुन. मग ते अटकमटकच्या राजाला येऊन भेटले. राजाने राजवैद्यांना पाचारण केलं. राजवैद्यांकडून त्यांना माझा पत्ता मिळाला आणि ते तडक माझ्याकडे आले. आणि मग आम्ही नवीन सदरे घेऊन लगोलग ह्या गावात परत आलो."



"रडत राऊतचे सदरे जाळून आणि सदा हसे कंपनीचे सदरे वापरायला सुरुवात करुन चवळीचटकचे लोकं पुन्हा हसू खेळू लागले"


आता रडत राऊत गुपचुप अदृश्य सदरे लहान मुलांच्या अंगावर टाकून पळून जातो. मग ती लहान मुलं सारखी रडत बसतात. तेव्हा तुम्ही सारखे रडत असाल तर समजून जा रडत राऊत तुम्हाला त्याच्याकडचा एक रहिलेला अदृष्य सदरा घालून पसार झालाय दुसर्‍या घरी. मग तुम्ही काय कराल? सदा हसेची आठवण काढा आणि त्याच्या आनंदी कंपनीचा गुदगुल्यांचा सदरा अंगावर चढवा

Thursday, July 22, 2010

यायाची गोष्ट

"आईSS"


"काय रे याया?"

"आई, काल ना शाळेत सायन्सच्या तासाला बाईंनी आम्हाला सांगितलं आम्ही आत्ता दिसतो तसे नव्हतोच लहानपणी" "म्हणजे ग काय?"

"काय तरी मेटाम... "

"मेटामॉर्फॉसिस म्हणजे रुपबदल"

"हा बरोबर आई, तेच म्हणाल्या बाई. तेच काय ते झाल. म्हणजे...मी आधी असा नव्हतो पंखवाला?" डोळ्यात अपार उत्सुकता आणून यायाने मला विचारलं.

"आता ह्याला कसं समजवावं बर....? पटकन आठवलं"

"याया, बाळा जा बर कपाटातून तुझा अल्बम घेऊन ये फोटोंचा"

"पण आई आधी सांग ना ते मेटा काय आहे ते" मी टाळतेय अस वाटून याया माझ्या पंखांना हलवून माझ लक्ष वेधून घेत म्हणाला

"अरे बाळा तेच सांगतेय, आधी अल्बम तर घेऊन ये" मी हलकेच टपलीत मारत त्याला म्हंटल तसा तो पळाला कपाटातून अल्बम आणायला

  "हाच अल्बम ना आई?"    त्याने हात उंचावत विचारलं



"होSS :) आण इकडे आणि बस माझ्या बाजूला. मी सांगते तुला आता, तू कसा होतास ते"


         "हे बघ हा कोण आहे फोटोत ओळख बघू!"  



एकदा फोटोकडे एकदा माझ्याकडे बघत गोंधळात पडलेल्या यायाकडे बघून मला हसूच येत होतं पण हसले तर स्वारीला राग यायचा नी मग तो रुसुन कुठल्या तरी झाडावर जाऊन बसायचा म्हणून हसू दाबत त्याला म्हंटल "अरे हा तुच आहेस"



त्याचा अजिबात विश्वास बसला नाहीये हे त्याचा चेहराच सांगत होता. मग कस समजवाव ह्याचा विचार करताना मला एका पुस्तकाची आठवण झाली.थांब ह्या पुस्तकातल एक चित्रच दाखवते तुला






"हे बघ फुलपाखरु होण्यासाठी आधी चार परिक्षा पार कराव्या लागतात. छोट फुलपाखरु आधी एक अंड असतं जसा तुझा फोटो तू बघितलास"



"मग ५-७ दिवसांनी त्या अंड्यातून एक अळी बाहेर येते त्यालाच कॅटरपिलर म्हणतात. त्या अळीच काम एकच झाडांची पानं खात सुटायचं नी वाढत जायचं"



"आई म्हणजे ह्या माझ्या फोटोसारख?"  



"आत्ता कस! बरोबर हा तुझाच फोटो आहे"



"पण अस अळी असताना खूप भीती असते हा बाळा. पक्षी ह्या अळया पकडून खातात."



"बापरे! मग मी कसा वाचलो?"



"ज्या अळ्या पानांच्या आड लपतात त्या वाचतात. आणि अळ्यांचा रंग पण बहुतेक वेळा पानांच्या रंगासारखा असतो ना म्हणून पटकन दिसत नाहीत त्या पक्षांना"



"हम्म! आई, बाई पण असच काहीतरी सांगत होत्या काल"



"पण तू आणि जाजा गप्पा मारत बसला असाल म्हणून तुला नीट कळल नाही आणि आता नुसतं मेटा मेटा करत बसला होतास. हो ना?"



"बर आई पुढे सांग ना काय होत ते" त्याने विषयाला बगल देत मला विचारलं



"अंड्यातून बाहेर पडण ही पहिली परीक्षा. ही पहिली परीक्षा पास झाल की अळी होता येतं ह्या तुझ्या फोटो सारख"



"भरपूर खाऊन टुमटुमीत झालेली अळी एकदिवस दुसरी परीक्षा द्यायला झाडाजवळ येते. आणि हि परीक्षा द्यायला चक्क उलटं लटकून स्वतःभोवती कवच करावं लागतं. अगदी बंदिस्त व्हाव लागत त्या कोशात. ती परीक्षा पास झाल की त्या अळीचा होतो प्युपा"
हा असा"



"बापरे! मग अंधारात भीती नाही वाटत त्याला?"



"अहं!, अजिबात नाही. फुलपाखरु असतातच धीट आणि त्या परिक्षा पास झाल्यावरच इतके छान पंख असलेल फुलपाखरु होता येत ना"



"म्हणजे मी पण नव्हतो घाबरलो?"



"तू तर शूरच आहेस तू कसा घाबरशील?" मी हसत म्हंटल



"आणि मग एक दिवस ह्या प्युपाला पंख येतात, त्याला सहा पाय, दोन डोळे, दोन अँटिना येतात आणि एक स्ट्रॉ सारखी नळी तयार होते तोंडाजवळ. मग त्याच बघता बघता सुरेखस फुलपाखरु तयार होत"  



हे असं



"आई, हे तर जाजाला पण माहित नसेल. उद्या बाई विचारतील तेव्हा मलाच सांगता येईल ना!" खुष होत अल्बम नाचवत याया मला म्हणाला.



"बर आता संपले असतील तुझे प्रश्न तर मी लागू कामाला? पाऊस पण थांबलाय बाहेर. तुला आज सानिका कडे नाही जायचं खेळायला?" आठवण करुन देताच अल्बम तिथेच टाकून स्वारी पंख झटकून बाहेर पण पडली



--------------------



"साSनिSकाSSS साSनिSकाSSS"    



काय रे याया,कित्ती उशीर केलास आज यायला?" रुसुन बसत सानु म्हणाली









"तुला माहितेय आज मी काSय काSय शिकून आलोय ते? तुला पण नसेल माहित फुलपाखरु कस होत ते" तिला चिडवत याया म्हणाला


"माहित्येय हॅ मॅला, आमच्या कढीपत्याच्या झाडावर कॅटरपिलर आलं की बाबा सांगतो मला, त्याचच फुलपाखरु होत म्हणून"


"शॅSS तू तर सगळा सस्पेंसच घालवलास" नाराज होत याया तिला म्हणाला. परत डोळे चमकून म्हणाला "पण पण तुला तेव्हढच माहितेय. तुला कुठे माहितेय आम्हाला चार परीक्षा द्याव्या लागतात ते." तिला चिडवत चिडवत याया म्हणाला तशी सानिका पण त्याच्या मागे लागली "ए सांग ना रे. मित्र ना तू माझा अस्स काय करतोस"


आत्ता कुठे त्याला पुन्हा स्पेशल वाटायला लागल "ऐक तर मग. आधी एक छोट्टस अंड असतं, मग त्यातून अळी बाहेर पडते ती अळी खा खा खात सुटते झाडांची पानं"


"ए पण नुसतीच पानं? तहान लागली तर काय करता रे? " मधेच सानिकाची शंका येते


"हॅ! त्या पानांमधे पण असतो की थोडा रस बर्‍याचदा पुरतो तो. आम्ही खातो खातो आणि वाढत वाढत जातो. अस वाढताना ४-५ वेळा आम्ही आमची जुनी त्वचा टाकून नवीन त्वचा तयार करतो"


"बापरे! म्हणजे सापासारखं?"


"हं! असेल" यायाला कुठे माहित असतो साप कोण ते. तो आपला हं हं म्हणून विषय संपवतो.


"आणि पुढे...?" मोठ्ठाल्या डोळ्यांनी सानु विचारते


"मग? मग आम्ही झाडाला लटकतो आणि स्वतःभोवती जाळं विणतो. तेव्हा कुठे आमचं अस रंगित पंखवालं फुलपाखरु होतं"


"बापरे! पण त्या जाळ्यात अंधार असेल ना?" सानु काळजीने विचारते

"असतो पण फुलपाखरु व्हायला हे तर करावच लागतं" याया शाईन मारत तिला म्हणतो


"हम्म! कित्ती क्युट आहेस रे तू" सानिकाला आपल्या ह्या मित्राचा खूप अभिमान वाटतो.


"ए! तुम्ही पण आमच्या सारख झोपता का रे?" ती पुन्हा विचारते


"अहं! आम्ही आराम करतो म्हणजे तुझ्या भाषेत झोपतो पण डोळे उघडे ठेवून"


"क्काय? डोळे उघडे ठेवून? म्हणजे हे अस्स?" सानू स्वतःचे डोळे ताणून दखवत विचारते


"आमच्या डोळ्यांना पापण्या नसतात ना, म्हणून आम्ही तसेच झोपतो. आणि ह्या स्ट्रॉ सारख्या दिसणार्‍या नळीने आम्ही फुलांमधला मध खातो"


"अच्छा! अस आहे तर. कित्ती मस्त ना. मला घेउन जाशील एकदा तुझ्या घरी?"


"जाईन, पण आता बाय मला भूक लागलेय. मी चाललो मध गोळा करायला"


"टाटा पुन्हा भेटू" 


अस म्हणून याया सानिकाच्या हातावरुन उडून जातो.

Sunday, July 18, 2010

गोष्टीची गोष्ट -२

पुन्हा एकदा मागणी झाली "आई, मरमेडची गोष्ट हवी त्यात याया पण हवाच हे ओघाने आलच"




"गोष्ट फार छोटी नको" हे पण शेपूट जोडीला होतं.



मग पुन्हा एकदा तिनेच मरमेडच नामकरण केलं "बार्बी" आणि आमची गोष्ट सुरु झाली.



एका निळ्या निळ्या समुद्राच्या तळाशी बार्बी नावाची मत्यकन्या रहात असते. तिच्या कपाळावर एक चमकता मणी असतो. ती तिथल्या राजा राणीची लाडकी मुलगी असते. खूप प्रेमळ असते ही बार्बी. त्यांच्या राजवाड्यात बरेच मासे, कासवं इतर जलचर प्राणी राजाची भेट घ्यायला येत असतात. राजा सिंहासनावर बसून त्या सगळ्यांना भेटत असे तेव्हा ही छोटी बार्बी त्याच्याच मांडीवर बसून राही. तिथेच तिला समजल की ह्या समुद्राच्या बाहेर देखील एक सुंदर जग आहे. तिथे तर्‍हेतर्‍हेचे प्राणी, राक्षस रहातात. तिथे चांदण्यात चमकणारी वाळू आहे, मोठ्ठी मोठ्ठी झाडं आहेत.



आणि झालं तिचा ६ वा वाढदिवस जेव्हा येतो जवळ तेव्हा ती हट्टच करते "मला समुद्राच्या बाहेर घेऊन चला



"बाळा, ते खूप लांब आहे आणि तिथे जायला बरेच दिवस लागतील. तू अजून छोटी आहेस शिवाय तिथे माणूस नावाचा प्राणी रहातो. माणूस प्राण्यात पण काही लोक दुष्ट आहेत. आणि आपण त्यांच्या तावडीत सापडलो तर ते आपल्याला मारुन टाकतील.आणि तुझ्या कपाळावरच्या मण्याच्या लोभाने ते तुला पकडून ठेवतील"



"नाही, मला तिथेच जायचय. आपण लवकर परत येऊ. मी हात सोडणार नाही तुम्हा दोघांचा. प्रॉमिस! समुद्रेश्वराची शपथ" अस त्यांना सांगून ती त्यांना तयार करते.



शेवटी लेकीच्या हट्टापुढे राजाराणी हात टेकतात आणि जास्त न रेंगाळता एका दिवसात परतायचं ह्या बोलीवर तिथे जायची तयारी करायला सुरुवात करतात.



बार्बीला खूप आनंद होतो. तिच्या मैत्रिणींना ती सांगते "मी तिथून तुमच्यासाठी चमकणारी वाळू घेऊन येईन. जमल तर झाडाचं पान आणेन आणि काय काय गमती करेन ते पण सांगेन" त्यादिवशी ती झोपेत पण त्याच विचाराने हसत असते हळूच.



दुसर्‍या दिवशी बरोबर कोरल्सच सँडवीच घेऊन राजाराणी आणि बार्बी निघतात प्रवासाला. प्रवास थोडा दमणूक करणारा असतो पण डॉल्फिन त्या तिघांना आपल्या पाठीवर बसवून किनार्‍याला आणून सोडतात.



किनार्‍याला पोहोचतात तेव्हा रात्र झालेली असते. किनार्‍यावर तशी सामसुमच असते. बार्बी चंद्रप्रकाशात चमकणारी वाळू बघून खुपच खुष होते.



पण त्या किनार्‍यावरच झोपडी बांधून एक माणूस रहात असतो. तो ह्या तिघांना बघतो. बार्बीच्या कपाळावरचा चमकणारा मोती बघून त्याला हाव सुटते. ह्या मत्सकन्येला पकडून मारले तर तो मणी विकून आपण खूप श्रिमंत होऊ असा विचार करुन तो एक योजना आखतो. त्याच्याकडे मासे पकडायच जाळं असतं. वाळूत खेळून दमून थकून तिथे बसलेल्या राजा राणी आणि बार्बीवर तो हळूच ते जाळं टाकतो आणि फासे आवळतो. त्यांना कळायच्याही आधी ते त्याच्या जाळ्यात अडकतात. धडपड करुन देखील जेव्हा सुटका होत नाही तेव्हा ते मदतीला हाका मारतात.



तिथूनच जवळ अबडक फुलपाखरु उडत जात असते. ते ह्या तिघांच्या मदतीच्या हाका ऐकतं पण ते असतं छोट आणि दुबळं मग ते यायाला बोलावतं. याया पण विचार करतो आणि काळू कावळयाला मदत करायला सांगतो.

काळू कावळा फार प्रेमळ आणि हुषारही असतो. तो थोडा विचार करतो आणि यायाला म्हणतो "आपण एकएकटे काही मदत करु शकणार नाही. तेव्हा असं करुयात.."

"मी त्या माणसाचं लक्ष माझ्याकडे वेधून घेतो त्याच्या जवळून उडत जाऊन. आपण उंदिर मामाचीही मदत घेऊयात. त्या मिंटू उंदराला सिंहाला जाळ्यातून सोडवण्याचा अनुभव आहेच. मी त्या माणसाला माझ्या मागे यायला लावून दूर नेईन. तोपर्यंत मिंटू त्यांना जाळ्यातून सोडवेल. तुम्ही दोघं माश्यांना निरोप द्या की आणि डॉल्फिन माशांना किनार्‍याजवळ बोलवून ठेवा. म्हणजे मिंटूने जाळं तोडल्या तोडल्या ते तिघेही डॉल्फिन्स वर बसून त्यांच्या घरी वेगाने जातील. अगदीच त्रास द्यायला लागला तो माणूस तर मी आणि चिमणी ताई मिळून त्याला चोच मारुन हैराण करु."



काळू कावळ्याची ही योजना ऐकून यायाला खूप आनंद होतो. आणि ठरल्याप्रमाणे सगळ घडून येऊन बार्बी आणि तिचे आई बाबा राजवाड्यात सुखरुन परत जातात.



थोड्याच दिवसात राजा खूप सारे मोती भेट म्हणुन याया, काळू, चिऊताई, मिंटू आणि डॉल्फिनला राजपत्रासोबत पाठवून धन्यवाद देतो आणि आपली मैत्री अशीच राहुदे अशी प्रार्थना करतो.

गोष्टीची गोष्ट

"आई, गोष्ट सांग ना!"



"एका गावात एक लाकुडतोड्या रहात असतो.."


"आSS ती नक्को, ती माहितेय मला"


"बर, मग भोपळ्यात बसणार्‍या म्हातारीची सांगते"


"नSक्कोSS"

"मग सांगू तरी कोणती?"

"रच्चून सांग"

"बर मग तुच सांग कोणती हवी?"

"फुलपाखराची सांगू?"

"चालेल" फुललेल्या चेहर्‍याने तिने होकार दिला आणि आमची गाडी पुढे सरकली.


"एका गावात फुलपाखर रहात असतात. अSSअ अ गावाचं नाव काय बर ठेवूयात? ते फुलातला मध खातात ना!मग मधुशाला ठेवुयात?"


"नक्को, त्यापेक्षा आपण आंबेगाव ठेवुयात. म्हणजे आंबे तरी खातील"


हसू दाबत मग गावाचं नामकरण होतं "आंबेगाव"


"तर त्या आंबेगावात फुलपाखरं रहात असतात."


"१००० आई १००० फुलपाखरं असतात"


"बर, त्या आंबेगावात हजार फुलपाखरं रहात असतात. त्यातल्या एकाच नाव असतं याया"


"हिहि! याया? चालेल"

"त्या यायाच्या आईचं नाव असतं.."


"आSSई, आSSई तिच नाव सिमा नाहितर सिमिन.. आणि"


"बर, तर आंबेगावात हजार फुलपाखर रहात असतात तिथेच या यायाच पण घर असतं. याया सकाळी उठून भराभर आवरुन शाळेत जात असतो.."


"आSSई, आSSई त्याची शाळा कशी असेल? त्याला ना शाळेत मध गोळा करायला शिकवत असतील. हो ना?"

"बरोब्बर, तर हा याया आणि त्याचा मित्र जाजा रोज सकाळी उठून शाळेत जात असतात मध कसा गोळा करायचा ते शिकायला"


"आSSई,आSSई "जाजा" नको"

"मग?"


"त्याच पण नाव यायाच ठेवूयात."


"अग, पण मग कळणार कसं कोण कोण आहे ते?"

"कळेल की, एक "याया कुलकर्णी असेल आणि एक याया जोशी" आमच्या वर्गातल्या इशान सारखा"

"खर्रच की, माझ्या हे लक्षातच नाही ह आलं"


"तर हे दोन्ही याया एकमेकांचा हात धरुन शाळेत जात असतात. एकदा काय होतं मधल्या सुट्टीत आईने दिलेला खाऊ खाऊन.."


"हॅ खाऊ नाही खात शाळेत. शाळेत पोळी भाजी खातात नाहीतर उपमा, पोहे खातात. जंक फुड इज नॉट अलाऊड इन स्कूल" "त्यांना देत नाहीत का टिफिन शाळेतूनच?"


"नाही ग त्यांची शाळा वेगळी आहे ना! विद्यानिकेतन मधे तुला देतात टिफिन पण विवेकानंद मधे कुठे द्यायचे?"


पटल पटल अशी मान डोलावली तिने आणि आमची गोष्ट परत एकदा याया कडे वळली.


मग गोष्टीत याया कुलकर्णी कसा वाट चुकतो, एका राक्षसाच्या घरात शिरतो. मग तो सिमिन आई सिमिन आई अस हाका मारत रहातो मदती साठी. घाबरुन राक्षसाच्या घरातल्या खिडकीला लावलेल्या ग्रील वर जाऊन बसतो.आणि तेव्हढ्यात तिथे एक छोटी राक्षसिण येते.


बाSSपरे! याया घाबरतो.

ती राक्षसिण त्याच्या जवळ जाते.


तो उडायचा प्रयत्न करतो पण घाबरल्यामुळे त्याला उडताच येत नसतं. तो फुलपाखरी भाषेत सांगत असतो "पकडू नको, मारु नको" पण ते राक्षसिणीला काही समजतच नसतं. तिला नुसतीच गुणगुण ऐकू येत असते. ती त्या फुलपाखराला पकडते. तो पंख सोडवून उडायचा प्रयत्न करतो तर त्याच्या पंखांचा थोडा रंग तिच्या बोटांना लागतो. ती त्याला स्वतःच्या तळहातावर ठेवते आणि मग खिडकी बाहेर हात काढून तशीच उभी रहाते. तेव्हा कुठे त्याला कळतं "ही चांगली राक्षस आहे. आपल्याला बाहेर पडायला मदत करतेय."


तो लगेच उडतो. परत जाण्यापुर्वी मागे वळून तिला थँक्स म्हणतो. तिला फक्त गुणगुण ऐकू येते पण तिला कळत त्या फुलपाखराला खूप आनंद झालाय. ती हे सांगायला घरात जाते. आणि आईच्या पदराला धरुन म्हणते "आई, परत कधी येईल ते फुलपाखरु आपल्याकडे?"


इकडे याया जोशी घाबरत याया कुलकर्णीच्या घरी पोहोचतो आणि काका काकुंना याया हरवल्याच सांगतो. सगळे काळजीत पडतात. सगळे इकडे तिकडे शोधायला लागतात. सिमिनला खूप काळजी वाटते. रडूही येतं. ती फुलपाखरेश्वराला हात जोडून नमस्कार करते आणि म्हणते "हे फुलपाखरेश्वरा माझ्या यायाचं रक्षण कर त्याला वाईट राक्षसांपासून वाचव."

सगळे शोधत शोधत पुर्ण शहर पालथ घालतात. शेवटी त्यांना एका घराबाहेरुन उडत आलेला याया दिसतो तेव्हा कुठे त्यांच्या जीवात जीव येतो. सिमिन तर त्याला कुशीत घेऊन रडते आणि पुन्हा असं कुठे हात सोडून जाऊ नकोस म्हणून रागावतेही.


याया सिमिनला त्या छोट्या आणि प्रेमळ राक्षसिणी विषयी सांगतो. तेव्हा त्याला आई कडून कळतं की ह्या राक्षसांच्या वस्तीत काही राक्षस फुलपाखरांच्या पकडून त्यांच्या पायाला दोरी बांधतात नाहीतर त्यांना काचेच्या बाटलीत बंद करुन ठेवतात. त्यांच्या चुलत भावा बहिणींना म्हणजे चतुर आणि टाचणीला पण हे राक्षस छळतात. पण काही राक्षस ह्या छोट्या राक्षसिणीसारखे प्रेमळही असतात.


"आई, मी कधीतरी त्या छोट्या राक्षसिणीच्या घरी जाऊ खेळायला?"


"जा पण मी किंवा बाबा बरोबर असताना"


"थँक यू आई"

याया अधून मधून सानिकाशी खेळायला जात असे. मस्त वेलीवर बसून झोके घ्यायला आणी तिच्या हातावर जाऊन ती काय चित्र काढतेय काय अभ्यास करतेय ते बघायला त्याला खूप आवडायचं

असेच बरेच दिवस जातात. त्या आंबेगावात कधी नव्हे त्या मारामार्‍या नी चोर्‍या व्हायला लागतात.


"आई, मारामार्‍या नकोत ग. मला नाही आवडत" इति लेक


"बर, आधी ऐक तर का होतेय मारामारी ते" गोष्ट सांगणारी मी


"ठिक आहे" म्हणत राजी झालेली ती


तर त्या आंबेगावात कधी नव्हे त्या मारामार्‍या नी चोर्‍या व्हायला लागतात.कारण काय? फुलपाखरे १००० आणि फुलं, झाडं किती? तर १०


मग त्यांच्यात मारामार्‍या कोणी कोणत्या फुलातला मध गोळा करायचा त्यावरुन. काही जण तर दुसर्‍याने गोळा करुन ठेवलेला मध हळूच चोरायचे ते कामावर गेले की. मग परत त्यावरुन मारामार्‍या. रोज कोणी ना कोणी पंख फाटला म्हणून फुलस्पितळात अ‍ॅडमीट. काही नाही तर जखमांवर उपचाराला ही भली मोठी रांग फुलखान्यात. एक दिवस ह्या सगळ्यावर उपाय काय ह्यावर चर्चा करण्यासाठी सिमिन आणि मोलू सगळ्या आंबेगावकरांना गावातल्या वेलीवर बोलावतात. त्यात सगळे आधी भांडतच बसतात. मग कोणीतरी म्हणत ह्यावर उपाय काय? असच भांडत बसलो तर आपण सगळेच अ‍ॅडमिट होऊ हातपाय मोडून.


मोठ्यांच्या मिटिंग बरोबर छोट्यांची पण एक मिटिंग भरते. त्यात याया सगळ्यांना सांगतो, "आई बाबांनी सांगितलय मला की फुलं, झाडं कमी आहेत म्हणून ही सगळी मारामारी होतेय्.दुसरी गाव शोधत बसण्यात सगळ्यांचीच शक्ती जाईल. मग असं केलं तर? आपण टिम पाडून


कामं वाटून घेऊयात. काही जणं दुसरी गावं शोधतील. काही आहे त्या फुलांवरुन मध गोळा करुन सगळ्यांना वाटतील तर काही जण चांगल्या राक्षसांना झाडं लावायला सांगतील."


"याया, अरे चांगली कल्पना आहे पण त्यांच्यातल्या चांगल्या राक्षसांना शोधणार कस?" यायाचा दुसरा मित्र जाजा त्याला विचारतो.


"अरे! एक छोटी प्रेमळ राक्षसिण माझी मैत्रिण आहे सानिका नावाची. ती करेल ना आपल्याला मदत"


"चालेल, मग आपण हे सगळं मोठ्यांना सांगुयात आणि आजच कामाला लागुयात"


आई बाबाच नाही तर संपुर्ण आंबेगावाला ह्या छोट्या फुलपाखरांचंकौतुक वाटतं. ते तसच करायचं ठरवतात.सानिकाला भेटायला याया आणि त्याच्या मित्र मैत्रिणींची टिम निघते.


इकडे सानिकापण आईला प्रश्न विचारुन हैराण करत असते. "आई, कधी परत येईल ग ते फुलपाखरु माझ्याशी खेळायला?" तितक्यात ग्रिलवर फुलपाखरच फुलपाखर येउन बसलेली तिला दिसतात. ती आनंदाने ओरडत त्यांच्याकडे पळते. त्या आवाजाने घाबरुन जाजा यायाचा हात घट्ट पकडून ठेवतो. पण याया त्याला हसत हसत धीर देतो.


याया उडत उडत सानिकाच्या हातावर जाऊन बसतो.आता त्या दोघांना एकमेकांची भाषा थोडी थोडी कळायला लागलेली असते. याया तिला त्यांच्या गावातल्या मारामार्‍या, झाडांच प्रमाण वगैरे सांगतो आणि तिला ती सगळ्या चांगल्या राक्षसांना झाडं लावायला सांगेल का ते विचारतो.


ती पण आनंदाने तयार होते आणि लगेच जाऊन आईला झाडं लावायचेत म्हणून सांगते.


फुलपाखरांना पण आनंद होतो. सानिकाने लावलेल्या इवल्या इवल्या झाडांवर बसून ते आपला आनंद व्यक्त करतात.


शाळेत गेल्यावर सानिका तिच्या सगळ्या मैत्रिणींना भक्तीला, रुचाला, श्रावणीला, केशवला, इशानला, आदित्यला ही फुलपाखरांची गोष्ट सांगते आणि त्यांनाही झाडं लावायला सांगते.


इथे आमची आजच्या दिवसाची गोष्ट संपते आणि दुसर्‍या दिवसासाठीची डिमांड आधीच नोंदवली जाते "आई, उद्या पिंकू परी हवी हा गोष्टीत..तिच्या कडे उडत जाणारं विमान हवं, झोपाळा हवा, चॉकलेटची झाड आणि आयस्क्रिमच कारंजं हवं..."

Friday, June 25, 2010

आटपाट नगरी

ऐक बाळा! तुझ्या साठी रचली कहाणी
आटपाट नगरा मधे रहात होती राणी

आवडायाचे तिला तिथले खळाळते पाणी
खळाळत्या पाण्यासह म्हणायची गाणी

गोड गोड गाणी गात ती चालायची वाट
आवडत मुळ्ळी नव्हता तिला उगा थाटमाट

राणी सारखाच होता अगदी; आटपाटचा राजा
कामाचा ना केला त्याने कध्धी गाजावाजा

आटपाट नगरामधे सारेच होते गोड
कध्धी नाही काढायाचे कुणाचीही खोड

आवडेल का ग फिरायला आटपाट नगरीत?
पण जायच्या आधी शिकून घ्यावी लागेल तिथली रीत

चालत नाही मारामारी, ना हेवेदावे काही
उगा कुरापत करु पहायाची नाही

फुलपाखराला पकडलं तर शिक्षा होते भारी
शिक्षा म्हणून कट्टी घेतात आटपाटची सारी

हे सारे नियम पाळतात राणी आणि राजा
म्हणून तर नियम पाळते इथली सारी प्रजा

अशी आहे आटपाट नगराची कहाणी
आवडले का आटपाटचे राजा आणि राणी?

बडबडगीत - टोपीविक्या

एके दिवशी टोपीविक्या
चालला होता बाजारी

डोक्यावरती ओझे घेऊन
थकला होता तो भारी

दिसता झाड; केला विचार
खाऊन घ्याव्या भाकर्‍या चार

झोपही घेऊ थोडीफार
मSग भरभर गाठू बाजार

नव्हते त्याला पण ठावूक
झाडावर होती माकडे खूप

माकडे होती फारच हुशार
टोप्या घेऊन झाली पसार

झोपून उठता बघतो तर
टोप्या नव्हत्या जागेवर!

वरती बघता प्रकार कळला
माकड रावांचा प्रताप कळला

दगड मारुनी घाबरवले
तरी न माकड घाबरले

काय करावे कळेना
डोकेच त्याचे चालेना

डोक्यावरची टोपी फेकुन
तो ही बसला हताश होऊन

बघता त्याची टोपी खाली
माकडांनीही नक्कल केली

नकले मुळे गंमत झाली
टोप्या सगळ्या पडल्या खाली

टोप्या सार्‍या गोळा करुन
ऐटीत निघाला टाटा करुन

बडबड गीत

http://www.youtube.com/watch?v=0L2aabyyJRU

आईची हाक आली पळा पळा
कामाची यादी सांगते पळा पळा


हे पुसुन ठेव, ते भरुन ठेव
म्हणे आंबे खुप खाल्लेस;
अता थोड जेव

जेवणात काय? तर पोळी नी भाजी
महिन्यातुन एकदाच म्हणे खावी पावभाजी

उन्हात नको जाऊ, म्हणे "सनस्ट्रोक होईल"

गर्दीत नको धावु, म्हणे "पळवुन कोणी नेईल"

घड्याळाची टिकटिक;
आईची किटकिट, थांबतच नाही
मनासारखं वागता येतच नाही

सानुची तक्रार आणि मागणी

सकाळची थंडी;
नी अंगात बंडी

उबदार दुलईत गुडुप्प व्हाव
जादुने घड्याळच गायब कराव

वाटत फार;
वारंवार

पण घड्याळाची टिकटिक
आईची किटकिट; थांबतच नाही
मनासारख झोपता येतच नाही

उठ ना रे बाळा;
आहे तुझी शाळा

आईचा धोशा चालुच राही
मनासारख झोपता येतच नाही

नको नको उठते;
शाळेत मी जाते

बाईंना तिळगुळ द्यायचाय ना आई?
चल आटप; बस माझी जाईल ना ग आई

उद्या आहे सुट्टी;
घड्याळाला बुट्टी

उद्या मला लवकर उठवायच नाही
घड्याळाला गजर लावायचा नाही

उशिरा मी उठणार;
लोळत मी पडणार

मग मला हट्टी म्हणायच नाही
लवकर अजिबात उठवायच नाही

सानुचे प्रश्न

देवबाप्पाच घर कुठे असतं आई?
त्यालाही असतात का बाबा आणि आई?

त्यालाही असते का शाळेत जायची घाई?
होमवर्क नाही केला तर ओरडतात का बाई?

बाबा म्हणतो "फ़िशू" आपला बाप्पा कडे गेला
बाप्पा एकटा कंटाळतो म्हणुन खेळायला का गेला?

खेळुन त्यांच झाल की येईल का मग घरी?
वाट पहाते सांग त्याला त्याची सानु घरी

अभ्यास पण मी करुन टाकला एकदम झटपट
दुध पण मी पिऊन टाकल एकदम घटघट

सांग त्याला आता मी शहाणी सानु झालेय
लवकर ये बाप्पा कडुन मी खाऊ घेऊन आलेय

सानु आणि पिंकु परी

पिंकु परी येते सानुच्या घरी
खाऊन जाते श्रिखंड पुरी

पिंकु परी जाते शाळेत जरी
जादुची छडी तिचा होमवर्क करी

पिंकु परीची बातच न्यारी
खेळायला येतात चांदण्या दारी

खेळायला आल्या चांदण्या जरी
सानु आवडते तिला भारी

सानुच्या स्वप्नात मग येते परी
गोड पापा घेते नी जाते तिच्या घरी